ठाणे (9 जानेवारी ): ठाणे महानगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या 6 नागरी पुनरूत्थान आराखड्यांस आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने विस्तृत चर्चेअंती मान्यता दिल्याने क्लस्टर योजना अंमलबजावणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आज महापालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या या बैठकीत विविध मुलभूत विषयांवर विस्तृत चर्चा झाल्यानंतर सहाही आराखडयांना मजुरी देण्यात आली.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, कोकण विभागाच्या नगर रचना विभागाचे सह संचलाक, वाहतूक पोलिस शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, म्हाडाचे कार्यकारी अभियंता आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी कोपरी, राबोडी, लोकमान्य नगर, किसननगर आणि टेकडी बंगला या सहा योजनांचे सादरीकरण करण्यात आले.
ठाणे शहरासाठी क्लस्टर योजनेचे एकून 44 आराखडे तयार करण्यात आले असून जवळपास 1489 हेक्टर क्षेत्र या योजनेतंर्गत विकसित होणार आहे. तथापि कोपरी, रोबोडी, टेकडी बंगला, हाजुरी, किसन नगर आणि लोकमान्यनगर या एकूण 6 आराखड्यांच्या माध्यमातून एकून 316.63 हेक्टर क्षेत्र विकसित करण्यात येणार असून त्यामध्ये 93.15 एवढे क्षेत्र रस्ते आणि आरक्षण म्हणून दर्शविण्यात आले आहे.
आज झालेल्या या बैठकीमध्ये शासकीय जमिनींवरील घरे मालकी हक्काने उपलब्ध करून करून देता येतील का याविषयी चर्चा होवून या जमिनींवरील घरे मालकी हक्काने देण्याबाबत राज्य शासनाला शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर हाजुरी आणि राबोडी या दोन पुनरूत्थान आराखड्यांमधील तलावांचे पुनरूज्जीवन करण्यावर समितीच्या सर्व सदस्यांनी भर दिला.
दरम्यान सद्यस्थितीत अस्तित्वातील जमीनीचा वापर, अस्तित्वातील सुविधा आणि पुनरूत्थान आराखड्यामध्ये करण्यात आलेल्या तरतुदी प्रस्तावित करण्यात आलेल्या सुविधा यावर सदस्यांनी विस्तृत चर्चा करून मंजुर विकास योजनेमध्ये जे ना विकास क्षेत्र किवा आरक्षित क्षेत्र आहे ते मोकळे ठेवण्याबाबत काळजी घेण्याविषयी सूचना केल्या.