मुंबई, दि. 2 : राज्यात 2ऑक्टोबरपासून नागपूर आणि नाशिक विभागात मौखिक आरोग्य सर्वेक्षण मोहीम पुन्हा हाती घेण्यात येणार असून, यासंदर्भात टाटा कर्करोग रुग्णालयाचे सहकार्य मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी सांगितले.
मंत्रालयात कर्करोग निदान व तपासणी मोहीमेसंदर्भात शनिवारी आढावा बैठक झाली. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, टाटा कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ.राजेंद्र बडवे उपस्थित होते.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संपूर्ण महिनाभर 34 जिल्ह्यांमध्ये मौखिक आरोग्य सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये 2 कोटी 15लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 2 लाख 62 हजार संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी सुमारे 2013 रुग्ण बायोप्सीसाठी संदर्भित करण्यात आले. त्यापैकी 1800 रुग्णांची बायोप्सी झाली. त्यातील मौखिक कर्करोगाचे 540 रुग्ण आढळून आले. त्यापैकी 490 रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले.
या मोहिमेत मौखिक आरोग्यासंदर्भात मोहिमेत नागपूर व नाशिक विभागांमध्ये अनुक्रमे 33 लाख 69हजार 380 व 53 लाख 64 हजार310 जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी नागपूर विभागात 307जणांची बायोप्सी करण्यात आली. त्यात 131 जणांचे निदान झाले असून 116 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक विभागात 746जणांची बायोप्सी करण्यात आली असून 208 जणांचे निदान करण्यात आले तर 188 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यापाठोपाठ (434) तर अहमदनगर जिल्ह्यात (141)जणांची बायोप्सी करण्यात आली या विभागात या दोन जिल्ह्यांमधून बायोप्सी झालेल्यांची संख्या मोठी आहे. नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्यातून (168) जणांची बायोप्सी करण्यात आली आहे. या दोन विभागात संशयित रुग्णांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त आढळून आल्याने आरोग्यमंत्र्यांनी येत्या 2ऑक्टोबरपासून या दोन विभागांमध्ये पुन्हा मौखिक आरोग्य सर्वेक्षण राबविण्याचे निर्देश दिले. यासाठी टाटा रुग्णालयाची मदत घेतली जाणार आहे.