नवी दिल्ली, दि. 14 : महाराष्ट्रामध्ये सध्या 17 जिल्ह्यांत दिव्यांग पुनर्वसन केंद्र असून पुढील काळात उर्वरित जिल्ह्यांमध्येही केंद्र सुरू होणार असल्याची माहिती, राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सहायक आयुक्त़ सुंदर सिंह वसावे यांनी आज येथे दिली.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने ‘जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र’ यांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, केंद्रीय दिव्यांग विभागाच्या सचिव शकुंतला डोले गॉमलिन तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील दिव्यांग पुनर्वसन चालविणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सध्या राज्यात 17 जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहेत. यापैकी 12 हे सक्रिय स्वरूपात आहेत. पुढील काळात उर्वरित 5 केंद्र पुन्हा सुरू करण्यात येतील. यासह प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र याप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांत दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. याविषयी पाठपुरावा सुरू असल्याचे श्री. वसावे यांनी सांगितले.
राज्यात सध्या दिव्यांगांचे सर्वेक्षण केले जात असून केंद्राकडून त्यांना पुरविण्यात येणाऱ्या ‘युनिक दिव्यांग ओळखपत्र’ देण्याचे काम सुरू आहे. दिव्यांगाना लागणारऱ्या साहित्याचे वाटप राज्याद्वारे केले जात आहे.
आज झालेल्या बैठकीत दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, साधने,क्षमता विकास, जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांसंदर्भातील जनजागृती कार्यक्रम, दिव्यांगांचे पुनर्वसन,पुनर्वसन करणाऱ्यांसाठी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, प्रशिक्षकांची वेतन वाढ आदी विषयांवर आज सविस्तर चर्चा झाली.
देशभरात एकूण 263 जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहेत. आज झालेल्या राष्ट्रीय परिषदेत त्यांचे प्रतिनिधी,राज्यातील वरिष्ठ अधिकारी,गैरशासकीय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.