ठाणे दि १०: युवा माहिती दूत या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थेट खेडोपाडी जाऊन लोकांना शासनाच्या योजना समजावून सांगण्याची संधी मिळणार आहे यादृष्टीने विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी यांनी ही सामाजिक जबाबदारी पार पाडावी असे आवाहनजोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या कात्यायन सभागृहात जिल्हास्तरीय “युवा माहिती दूत” कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. नाईक बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक प्रा. बाबासाहेब बिडवे, जिल्हा समन्वयक प्रा. सावदेकर, या उपक्रमाचे प्रवर्तक कुणाल छाजेड, जिल्हा माहिती अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी देखील यावेळी या उपक्रमाविषयी माहिती दिली.
यावेळी जिल्ह्यातील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी आपल्या महाविद्यालयात या ॲप्लीकेशन विषयी विद्यार्थ्यांना माहिती दयावी तसेच सामाजिक जबाबदारीत आपण मागे नाही आहोत हे दाखवून द्यावे असे सांगितले.
कार्यक्रम समन्वयक प्रा. बाबासाहेब बिडवे यांनीही युवा माहिती दूत या उपक्रमाची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करून विद्यार्थ्यांचा सहभाग जास्तीत जास्त संख्येने कसा वाढेल हे पाहण्याचे आवाहन केले.
उत्कृष्ट काम करणाऱ्या महाविद्यालय, कार्यक्रम अधिकाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली. जिल्हा माहिती अधिकारीअनिरुध्द अष्टपुत्रे यांनी सादरीकरणाद्वारे “युवा माहिती दूत” या उपक्रमाविषयी तपशीलवार विवेचन केले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या तीन चित्रफितीद्वारे उपक्रमाची माहिती देण्यात आली. कुणाल छाजेड यांनी प्राध्यापकांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन केले तसेच यातील तांत्रिक माहिती प्रात्यक्षिकासह दाखविली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जोशी बेडेकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्रा शिवाजी नाईक यांनी केले. यावेळी सहभागी कार्यक्रम अधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली.
*काय आहे युवा माहिती दूत*
शेतकरी, महिला, आदिवासी, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ज्येष्ठ नागरिक अशा विविध समाज घटकांसाठी शासन राबवित असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्य म्हणून संबंधित कुटुंबांना थेट भेटून द्यावी अशी ही योजना आहे.
या करिता ‘युवा माहिती दूत’ या प्ले स्टोअरवरील अॅप्लिकेशनमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी नोंदणी करावयाची आहे. युवा माहिती दूत झालेल्या युवकाने सहा महिन्यात 50 घरी जाऊन त्या कुटुंबाला लागू पडतील अशा योजनांची माहिती द्यावयाची आहे आणि त्याचा लाभ घेण्याकरिता कोणाशी संपर्क करावा, याबद्दल माहिती द्यावयाची आहे. राज्यातील सुमारे 1 लाख विद्यार्थी यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. या विद्यार्थ्यांना शासनाचे माहिती दूत म्हणून ओळखपत्र मिळेल आणि प्रमाणपत्र मिळेल.