डोंबिवली :- ( शंकर जाधव ) डोंबिवलीजवळील दावडी- सोनारपाडा येथील एका शेतकऱ्याच्या ५ ते ६ एकर जमिनीवरील पिकांना अज्ञात इसमांनी आग लावल्याने भस्मसात झाले. गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लावल्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली असून यापाठीमागे जो कोणी असेल त्याला लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे. २३ ऑक्टोबर रोजी कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या सोनारपाडा गावठाण हद्दीत चौघा अनोळखी व्यक्तींनी ड्रोनद्वारे सर्व्हे करताना त्या भागातील शेती जाळली होती. संतप्त गावकऱ्यांनी पकडून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले होते. आता या घटनेत मानपाडा पोलीस पिकांना आग लावणाऱ्यांना कधी अटक करतील याकडे येथील ग्रामस्थाचे लक्ष लागले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील दावडी- सोनारपाडा गाव समाविष्ट आहे. येथील शेतकरी दिलीप पाटील यांच्या मालकीच्या १३ क्र आणि १८ क्र सर्वेच्या शेतजमीनवरील पिकांना दुपारी आग लागण्याचे काही ग्रामस्थांनी घरी फोन करून सांगितले. या आगीत तुरीची लागवड, कलमे, आणि भातशेती जळून खाक झाली होती.ठाकूर यांनी मानपाडा पोलिसांना कळवताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली.याबाबत शेतकरी दिलीप ठाकूर यांना विचारले असता ते म्हणाले, या घटनेमुळे आमचे खूप नुकसान झाले आहे. याची पोलिसांनी गंभीर दाखल घेतली पाहिजे. आमचा एका विकासकावर संशय असून त्याची पोलिसांनी चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. तर ग्रामीण नेते गणेश म्हात्रे यांनी सदर ठिकाणची पाहणी केली. म्हात्रे यांनी पिकांना आग लागली का लावली याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. या घटनेची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना देणार असून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे आहे. दरम्यान गेल्या महिन्यापासून ही दुसरी घटना असल्याने येथील शेतकरी संतप्त झाले आहेत.