मुंबई, दि. 6 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे,सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, भाई गिरकर, कालिदास कोळंबकर, प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त जगदीश पाटील, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले समतेचे राज्य निर्माण करु. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व संविधानानुसार आम्ही काम करीत आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व संविधानानेच भारत जगातील सर्वोत्तम देश बनू शकतो. यावेळी श्रीमती कमला मेहता अंधशाळा दादर येथील अंध विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला यावेळी भेट दिली.