नवी दिल्ली, दि. 5 : माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आयोजित ‘इंडियन पॅनोरमा चित्रपट महोत्सवात’ एकूण 10 मराठी चित्रपट दाखविण्यात येत आहेत. आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘खरवस’ चित्रपटाने उद्घटनाच्या चित्रपटाचा मान मिळवला आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाच्यावतीने येथील सिरीफोर्ट ऑडिटोरियम मध्ये 4 ते 13 जानेवारी 2019दरम्यान इंडियन पॅनोरमा चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. मराठी चित्रपट ‘खरवस’ आणि ‘वोलू’ या ‘मल्याळम’ चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात झाली.
दहा दिवस चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात एकूण 47 चित्रपट दाखविण्यात येणार असून यात 10 मराठी चित्रपटांचा समावेश आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शेखर रणखंबे दिग्दर्शित ‘पाम्फलेट’ आणि गौतम वझे दिग्दर्शित ‘आईशप्पथ’ चित्रपट दाखविण्यात आले. तिसऱ्या दिवशी रविवारी (सायं. 5.30 वा.) नितेश पाटणकर दिग्दर्शित ‘ना बोले वो हराम’, मंगळवारी सकाळच्या सत्रात (11 वा.) स्वप्नील कपुरे दिग्दर्शित ‘भर दुपारी’ व याच सत्रात ‘आम्ही दोघी’ हा प्रतिमा जोशी दिग्दर्शित चित्रपट तर तर दुपारच्या सत्रात (2.30 वा.) प्रसन्न पोंडे दिग्दर्शित ‘सायलेंट स्क्रिम’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
गुरूवार दिनांक 10 जानेवारी ला सायंकाळच्या सत्रात (5.30 वा.) सुहास जहांगिरदार दिग्दर्शित ‘एस आय एम माऊली’ तर शुक्रवारी सायंकाळच्या सत्रात (5.30 वा.) निपुन धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’ हा चित्रपट आणि शनिवारी सकाळच्या सत्रात (11 वा.) मेधपर्णव पवार दिग्दर्शित ‘हॅप्पी बर्थडे’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. यापैकी आम्ही दोघी आणि धप्पा वगळता अन्य नॉन फिचर फिल्मस् आहेत.