कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील अनेक प्रकल्प रखडलेले असतांना आता कल्याणकरांना हवाई रिक्षाचे चॉकलेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महत्वाकांक्षी ‘सिटीपार्क’ प्रकल्पाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार नरेंद्र पवार, महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे, पालिका आयुक्त गोविंद बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रीपूल पाडल्याने आणि दुर्गाडी पुलाचे रखडलेले काम यामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. स्टेशन परिसरात देखील चुकीच्या नियोजनामुळे बांधलेले स्कायवॉक ओस पडून असून याजागी सॅटीस प्रकल्प राबविणे आवश्यक होते. स्मार्ट सिटी अंतर्गत हा प्रकल्प प्रस्तावित देखील आहे. तर काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोचे भूमिपूजन देखील केले आहे. यातच भर म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीत हवाई रिक्षाचा प्रकल्प राबविणार असल्याचे जाहीर केल्याने नागरिकांना आणखी एक चॉकलेट दिले असल्याची चर्चा कल्याणकर सामान्य नागरिक करत आहेत.
आजचा हा प्रकल्प भूमीपूजन महत्वाचे असून कल्याणासाठी काहीतरी नवीन करणार आहोत. विकासासाठी सगळे एकत्र येत आहेत ही खूप मोठी गोष्ट असल्याचेही आदित्य म्हणाले. तरुण म्हणून 2 पैलू बघत असतो. जनतेला खूप वर्ष अजून उत्तरं द्यायची नसून मी खोटं बोलून लोकांपुढे जाणार नसल्याचेहि त्यांनी सांगितले. .स्मार्टसिटी म्हणजे नक्कि काय? नुसते इंटरनेट,केबल, वायफाय कनेक्टिव्हिटी नाहीये तर चांगली सिटी कशी होईल हे महत्वाचे आहे. इतर शहरेही विकसित होणे गरजेचे आहेत. मेट्रोनंतर ठाण्यात अंतर्गत प्रकल्प मंजूर केला असून हवाई रिक्षा हा प्रकल्प आपण ठाण्यात राबवणार आहोत. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीत देखील हवाई रिक्षा आणली पाहिजे असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे आहेत ते प्रकल्प रखडलेले असतांना निवडणुकीच्या तोंडावर चांगलेच चॉकलेट आदित्य ठाकरे यांनी कल्याणकरांना दिले असल्याची उपस्थितांमध्ये रंगली होती.
दरम्यान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर निदर्शने करण्यापूर्वीच मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांना खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले होते.