ठाणे : ( संतोष पडवळ) संसदेचं काम पाहण्यासाठी दिल्लीला गेलेल्या ठाण्यातील सुमारे ४५ नगरसेवकांना एका थरारकअनुभवाला सामोरं जावं लागलं. खासदार राजन विचारे यांच्यासह ठाण्यातील हे नगरसेवक संसदेचं काम पाहण्यासाठी दिल्लीला निघाले होते. मुंबईहून सव्वा दहाच्या गो-एअरच्या विमानानं दिल्लीला निघाले होते. मात्र मध्येच विमानाचं इंजिन हादरे देऊ लागल्यामुळं या विमानाला मुंबईत पुन्हा घाईघाईनं उतरवावं लागलं. या विमानामध्ये ४५ नगरसेवकांसह एकूण १६० प्रवासी होते. वैमानिकाच्या कौशल्यामुळे यापैकी कोणालाही कसलाही त्रास झाला नाही. वैमानिकाला इंजिन योग्य पध्दतीनं काम करत नसल्याचं लक्षात आल्यावर त्यानं शांतपणे निर्णय घेत हे विमान मुंबई विमानतळावर सुखरूप उतरवलं. विमानानं उड्डाण केल्यानंतर ४० मिनिटांनी विमानात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची घोषणा करण्यात आली. मात्र नक्की तांत्रिक अडचण काय आहे याची कल्पना प्रवाशांना देण्यात आली नाही. वैमानिकाच्या दक्षतेमुळं आमचे प्राण वाचले अशी भावना नंतर प्रवाशांनी व्यक्त केली. एकंदरीतच या नगरसेवकांना दिल्लीचा हा प्रवास कायमचा लक्षात राहणारा ठरला.
संसद पहायला गेलेल्या ठाण्यातील ४५ नगरसेवकांना मिळाला थरारक अनुभव
January 11, 2019
190 Views
1 Min Read

-
Share This!