पुणे, दि. 17 : खेलो इंडिया युथ गेम्सच्या माध्यमातून देशातील युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असून त्याचा प्रत्यय आज या ठिकाणी येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून देशाला आणि राज्याला अनेक मोठे खेळाडू मिळतील, असा विश्वास पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली.
महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात राष्ट्रीय युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे आयोजित ‘इंडिया का खेलोत्सव’ स्पोर्ट एक्स्पोमध्ये श्री. लोणीकरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना काल बक्षीस वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. लोणीकर म्हणाले, ‘खेलेगा भारत, तो खिलेगा भारत’ अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तमाम भारतीयांना साद घातली आणि त्याची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य संधी घेऊन महाराष्ट्राला या स्पर्धेचे यजमानपद मिळवून दिले. खेलो इंडिया स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून या स्पर्धेतून देशाला चांगले खेळाडू मिळतील आणि तेच खेळाडू जागतिक पातळीवर देशाचे नावलौकिक करतील. प्रत्येक भागातील प्रतिभावान खेळाडूंना यानिमित्ताने आपले कौशल्य सादर करण्याची संधी या स्पर्धातून मिळाली आहे. या क्रीडा महोत्सवातून अनेक खेळाडूंना चालना मिळेल, भावी खेळाडू घडतील आणि क्रीडा संस्कृती बळकट होण्यास मदत होईल, असे मत श्री. लोणीकर यांनी व्यक्त केले.
श्री. लोणीकर म्हणाले, खेलो इंडिया या स्पर्धेच्या माध्यमातून तरूण खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळत आहे. सुदृढ पिढी घडविण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग होईल. राज्याच्या क्रीडा विभागाने अत्यंत कमी वेळेत या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले आहे. त्याबद्दल क्रीडामंत्री विनोद तावडे यांचे कौतुकही यावेळी श्री. लोणीकर यांनी केले.
खेलोत्सवास आलेल्या शालेय विद्यार्थ्यांशी आणि खेळाडूंशी श्री. लोणीकर यांनी संवाद साधला. तसेच खेलोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट दिली.
या प्रसंगी राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर तसेच स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या श्रीमती राणी द्विवेदी यावेळी उपस्थित होत्या.