अंबरनाथ दि. ३० (नवाज अब्दुलसत्तार वणू)
अंबरनाथ शहरातील पाणी पुरवठ्याचे पुनर्नियोजन करण्याची गरज निर्माण झालेली असल्याचे मत अंबरनाथ नगरपरिषदेचे पाणी पुरवठा सभापती संदीप भराडे यांनी व्यक्त केले आहे. अंबरनाथ शहराला आवश्यक असलेला पाणी साठा उपलब्ध असतानाही केवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्य व्यवस्थेमुळेच शहरात पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगून यामुळे शहरात पाणी पुरवठ्यावरून उद्रेक निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे संदीप भराडे यांनी म्हटले.
अंबरनाथ शहराला औद्योगिक विकास महामंडळ, चिखलोली धरण यांच्या माध्यमातून पुरेसा पाणी पुरवठा केला जात आहे. जलकुंभ योजना, अमृत योजना राबविल्या जात आहेत. मात्र पाणी पुरवठ्याचे योग्य ते नियोजन होत नसल्याने शहराच्या काही भागात, नागरी वसाहतीत दोन-दोन दिवस पाणी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक भागात गढूळ पाणी पुरवठा होत असतो.
झोपडपट्टी, नागरी वसाहती, मोठमोठया नागरी संकुलांमध्येही पाणी पुरवठ्याची समस्या तीव्र आहे. त्याबाबतही मजीप्राला नागरिक जाब विचारत असतात. पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही पाणी पुरवठा न झाल्याने नागरिकांमधील संताप वाढत असल्याचे दिसत असल्याचे सांगून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर शहरातील विविध भागातील नागरिक वारंवार मोर्चे काढून, निवेदने देऊन आपली समस्या मांडत असतात. शहरातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी मजीप्राच्या अधिकाऱ्यांना वारंवार जाब विचारण्याचे काम केले आहे. विविध संघटना याबाबत सातत्याने आंदोलने करत असतात.
नगरपालिकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा सभापती म्हणून जबाबदारी पार पाडत असताना नागरिकांना होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा त्रास पाहताना नागरिकांत प्रचंड संताप निर्माण झाला असून त्याचा उद्रेक होईल अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचे संदीप भराडे यांनी म्हटले आहे.