ठाणे (संतोष पडवळ) : येत्या मार्चपासून ठाणे जिह्याला पाणीटंचाईचे भयंकर चटके सोसावे लागणार आहेत. नोव्हेंबरमध्ये 22 टक्के लागू झालेली पाणीकपात जानेवारीत 30 टक्के झाली. आता तर मार्चपासून 40 टक्क्यांवर ही पाणीकपात जाण्याची शक्यता आहे. बारवी आणि आंद्र धरणातील पाण्याचा जुलैपर्यंत पुरवठा व्हावा यादृष्टीने जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाने पाणी नियोजनासाठी कठोर नियोजन हाती घेतले आहे. यामुळे ठाणेकरांचे आठवडय़ातील 24 तासांचे शटडाऊन 36 तासांवर जाणार आहे.
उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन दरवर्षी जूनपर्यंत पाणीकपातीचे वेळापत्रक निश्चित केले जाते. जूनच्या प्रारंभी पावसाने दमदार एंट्री केली तर पाणीकपात लगेच रद्द केली जाते. या वर्षी पाण्याची मागणी वाढल्याने 31 जुलै ही पाणीकपातीची संभाव्य तारीख निश्चित केली आहे. यामुळे बारवी आणि आंद्र धरणातील उपलब्ध पाणी साठा जुलैपर्यंत पुरवण्यासाठी जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाने नियोजन केले आहे. बारवी धरणात 230 द.ल.घ.मी इतका पाणी साठा असून आंद्र धरणात 205 द.ल.घ.मी पाणी साठा आहे. धरणातील घटणारा पाणी साठा पाहता मार्चपासून 40 टक्के पाणीकपातीची टांगती तलवार आहे. त्यामुळे आता आठवडय़ातून 24 तास पूर्णपणे बंद असणारा पाणीपुरवठा 36 तासांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण – डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे, मीरा – भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, एमआयडीसीतील कंपन्या या सर्वांनाच पाणी जपून वापरावे लागणार आहे.