ठाणे : प्रतिनिधि (संतोष पडवळ): ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विशेष प्रयत्नांने जोगिला मार्केट येथील सिमेंट काँक्रीटमध्ये निद्रिस्त झालेल्या जोगिला तलावाच्या पुनर्नवीनीकरण उपक्रमाला भारत सरकारच्या जलसंपदा मंत्रालय, नदी विकास आणि गंगा कायाकल्प, सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड, स्वच्छ गंगा राष्ट्रीय मिशन आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या ”वॉटर डायजेस्ट वॉटर अवॉर्ड्स 2018-19” या मानाचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नवी दिल्ली येथील हॉटेल द ललित येथे मोठ्या शानदार समारंभात पाणी स्त्रोतांचे पुनर्नवीनीकरण या विभागात ठाणे महापालिकेने जोगिला तलावाच्या पुनर्नवीनीकरण उपक्रमांतर्गत केलेल्या विशेष कार्याबद्दल पालिकेस हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे.
भारत सरकारच्या जलसंपदा मंत्रालय, नदी विकास आणि गंगा कायाकल्प, सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड, स्वच्छ गंगा राष्ट्रीय मिशन आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष समितीमार्फत देशभरातील ग्रामीण व शहरी भागात स्थानिक स्वराजसंस्थांनी पाणी स्त्रोतांचे पुनर्नवीनीकरणाबाबत केलेल्या प्रकल्पांची पाहणी करण्यात आली होती. ठाणे महापालिकेच्या जोगिला तलावाच्या पुनर्नवीनीकरण प्रकल्पांची विशेष नोंद घेत महापालिकेस हा पुरस्कार देण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्यावतीने जोगिला तलावात अस्तित्वात असलेल्या सर्व नैसर्गिक स्रोत्रांचा शोध घेऊन ते संरक्षित करण्यात आले आहेत. अशा पद्धतीने पुनरूज्जीवित करण्यात येणारे हे देशातील पहिले उदाहरण असून जोगिला तलावाचे खोदकाम करून दोन ते तीन पिटस् तयार करून भूतंर्गत पाण्याची पातळी, अस्तित्वातील झरे पुनरूज्जीवित करण्यात आले आहे.