मुंबई, दि. 14: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला जोडणारा पादचारी पूल कोसळून आज (दि. 14) सायंकाळी झालेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी असून त्याची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दुर्घटनेतील क्षतीग्रस्त कुटुंबियांप्रती सरकार संवेदना व्यक्त करीत असून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची तातडीची मदत सरकारकडून दिली जाणार आहे. तसेच जखमींच्या उपचारांचा सर्व खर्चदेखील सरकारकडून करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून इतर जखमी आहेत. या संपूर्ण घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. यापूर्वी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये या पुलाचेही ऑडिट करण्यात आले होते. मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या ऑडिटस्मध्ये हा पूल योग्य स्थितीत असल्याचे आढळले होते, तथापि त्यामध्ये किरकोळ दुरुस्ती कामे सुचविण्यात आली होती. असे असतानाही, ही दुर्घटना घडल्याने स्ट्रक्चरल ऑडिट प्रक्रियेची देखील चौकशी करण्यात येईल. स्ट्रक्चरल ऑडिट व दुरुस्ती कामांमध्ये निष्काळजीपणा झाल्याचे आढळल्यास त्यातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून ही संपूर्ण चौकशी करुन कठोर कारवाई करण्यात येईल.