नवी दिल्ली : भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीला अखेर मुहूर्त सापडला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 184 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा यामध्ये करण्यात आली असून 14 विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.
भाजप महाराष्ट्रात 25 जागा लढवणार आहे. भाजपने केवळ अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. लातूरमध्ये सुधाकर राव शृंगारे, तर अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाकीच्या 14 जागांवर विद्यमान खासदारांनाच पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे.
भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार
नंदुरबार – हीना गावित
धुळे – सुभाष भामरे
रावेर- रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
गडचिरोली-चिमुर – अशोक नेते
चंद्रपूर- हंसराज अहिर
जालना – रावसाहेब दानवे
भिवंडी – कपिल पाटील
मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी
मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन
अहमदनगर – सुजय विखे पाटील
बीड – डॉ. प्रीतम मुंडे
लातूर – सुधाकरराव शृंगारे
सांगली – संजयकाका पाटील
भाजप मुंबईतील सहापैकी तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र किरीट सोमय्या खासदार असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघ वगळता इतर जागांवरील उमेदवारांची घोषणा झाली. शिवसेनेकडून सोमय्यांच्या नावाला विरोध असल्यामुळे सोमय्यांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची चर्चा आहे.
सोलापुरात सुशीलकुमार शिंदे, बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोणते उमेदवार द्यायचे, याबाबत अद्याप भाजपचा निर्णय झालेला दिसत नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीकडून माढ्याचा तिढा सुटत नसल्यामुळे भाजप त्याठिकाणीही आस्ते कदम घेताना दिसत आहे.