ठाणे : लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पाडतांना या प्रक्रियेतील प्रत्येक घटकाने आपापल्या कामाचे सूक्ष्म नियोजन करतांनाच निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी आज येथे दिले.
कोकण विभागीय आयुक्त यांनी आज ठाणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्ह्यातील 23- भिवंडी, 24- कल्याण आणि 25 – ठाणे या तिनही लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी ठाण्याचे अनिल पवार, भिवंडीचे किशन जावळे, कल्याणचे शिवाजी कादबाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी तसेच सर्व नोडल अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या कामकाजाचा आढावा सादर केला. आपल्या मार्गदर्शनात डॉ. पाटील म्हणाले की, जिल्ह्यात दिव्यांग मतदारांना निवडणूका सुलभ व्हाव्यात यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने होत असलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच आगामी काळात सण, उत्सव आदी साजरे होतांना आचारसंहिता भंग होणार नाही याकडे काटेकोर लक्ष असू द्यावे, अशा सुचना त्यांनी केल्या. याशिवाय मतदार सहायता केंद्रात आवश्यक त्या सर्व सुविधांची उपलब्धता करण्यावर निवडणूक यंत्रणेने भर द्यावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.