मुंबई : मुंबई सारख्या शहरांमध्ये रिक्षाचालकांची मनमानी ही नवी समस्या नाही. ही समस्या दूर करण्यासाठी विभागीय परिवहन कार्यालयाने मुंबईत मोठे अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी स्वत: ग्राहकांच्या भूमिकेत शिरत सत्य परिस्थिती तपासण्याचाही प्रयत्न केला. या अंतर्गत आरटीओने जवळचे भाडे नाकारणाऱ्या एकूण ७०० रिक्षाचालकांचे परवाने रद्द केले आहेत.
२८ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान हे अभियान चालवले गेले. या अभियानात एकूण ५, २१२
रिक्षाचालक नियमांची पायमल्ली करताना आढळले. यां पैकी सुमारे २,६०० रिक्षाचालकांचे परवाने जप्त करण्यात आले आहेत. तर, यां पैकी एकूण ७०० परवाने जवळची भाडी नाकारल्याच्या कारणावरून रद्द करण्यात आले आहेत.
अतिरिक्त भाडे आकारणे, नियम डावलून तीनपेक्षा अधिक लोकांना रिक्षात बसवणे, बॅचविना किंवा परवान्याविना रिक्षा चालवणे यावरील कारवाईपोटी परवाने जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत एकूण १७१ रिक्षाही ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराचा प्रवाशांना कशाप्रकारे मनस्ताप होतो याची कल्पना आम्हाला आहे, असे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी सांगितले. हे अभियान पुढील काही महिने चालेल.