नवी दिल्ली दि. 3 : रामदास आठवले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून तर संजय धोत्रे यांनी दूरसंचार विभागाचे राज्यमंत्री म्हणून आज पदभार स्वीकारला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रीमंडळाचे नुकतेच खातेवाटप झाले असून महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा समावेश आहे. यापैकी रामदास आठवले यांनी आज शास्त्री भवनात सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला त्यांच्या पत्नी सीमा आठवले, मुलगा जीत आठवले आणि मंत्रालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. तर संजय धोत्रे यांनी दूरसंचार भवनात दूरसंचार राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला.
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन रक्कम व विद्यार्थी शिष्यवृत्तीत वाढ करणार
रामदास आठवले
पदभार स्वीकारल्यानंतर श्री आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्रालयाच्यावतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. मंत्रालयाच्यावतीने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी २.५ लाख रूपये प्रोत्साहन रक्कम देण्यात येते. आगामी काळात ही रक्कम वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सद्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना माध्यमिक पूर्व व माध्यमिकोत्तर शिष्यवृत्ती २९० ते १२०० रूपयांपर्यंत देण्यात येते, या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या १० वर्षांपासून शिष्यवृत्तीची ही रक्कम कायम असून त्यात वाढ करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले .
अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणा-या शिष्यवृत्तीच्या कोटयात वाढ करण्यात येईल, तसेच मंत्रालयाअंतर्गत कार्यरत डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने अनुसूचित जातीतील जनतेला शस्त्रक्रियेसाठी देण्यात येणारी ३.५ लाखांच्या रकमेत वाढ करण्यात येणार असल्याचेही श्री. आठवले यांनी यावेळी सांगितले. अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणा-या निधीमध्ये ५५ हजार कोटींहून वाढ होऊन ७६ हजार कोटी रूपये झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
देशातील ९० टक्के जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय येत्या काळातही सक्षमपणे कार्य करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.