* “आता बस झालं, अजून किती सहन करायचं”,
* कल्याण बदलापूर रोडवर “२९ निरपराधांचा बळी, तब्बल १०६ अपघात व असंख्य असुविधा याला जबाबदार कोण ?”
अंबरनाथ दि. १८ (नवाज वणू) अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गाच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरण्याच्या कामात ठेकेदार व एमएमआरडीएच्या काही संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला असून या रोडवर २९ निरपराधांचा बळी गेलेला आहे, तर तब्बल १०६ अपघात झालेलं आहे. निरपराध नागरिकांचे बळी थांबविण्यासाठी एमएमआरडीए व पिडब्लूडी प्रशासनाची कुंभकर्णी झोप उडविण्यासाठी अंबरनाथमधील काही नगरसेवक व सामाजिक संघटनेच्या वतीने गुरुवारी “रास्ता रोको आंदोलन” करण्यात आले, या आंदोलनाची सुरुवात अंबरनाथ महात्मा गांधी चौक येथे महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर पिडब्लूडीच्या अधिकारी सौ. टेंबुरणेकर मॅडम यांना लेखी निवेदन देऊन या प्रकरणी उचित चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, तसेच कल्याण बदलापूर रस्त्यावर ट्राफिक जाम, नो झेब्रा क्रॉसिंग, नो साईन बोर्ड, नो डिव्हाईडर्स, नो स्ट्रीट लाईट आदी समस्या देखील तातडीने सोडविण्यात याव्यात. अशी मागणी नगरसेवक व सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली.
या शिष्टमंडळात नगरसेवक ऍड. संदीप भराडे, शशांक गायकवाड, सुरेंद्र यादव, समाजसेवक मनोज सिंग, स्वाभिमान संघटनेचे अंबरनाथ शहराध्यक्ष विकास सोमेश्वर, सुमेध भवार युथ फाऊंडेशनचे सुमेध भवार आदींचा समावेश होता. यावेळी पिडब्लूडीच्या अधिकारी सौ. टेंबुरणेकर मॅडम यांनी येत्या सोमवारी अंबरनाथ नगरपालिकेच्या सभागृहात संबंधित अधिकारी व वाहतूक विभाग यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.