मुंबई : तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी २६ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळं पुण्याहून मुंबईला येणाऱ्या सिंहगड व प्रगती एक्स्प्रेस या गाड्या आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. याशिवाय, अन्य १३ गाड्या पुण्यापर्यंत तसंच, पुण्यापासून पुढे धावणार आहेत.
लोणावळा ते कर्जतदरम्यान हे दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबईहून सुटणाऱ्या कोयना, सह्यादी, महालक्ष्मी एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार आहेत. त्यामुळं या आठ दिवसांत प्रवाशांनी मुंबईत येण्या-जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.