दिवा, ता. 24 (बातमीदार): दिवा शहरातील विजेच्या लपंडावाची समस्या सोडविण्यासाठी बुधवारी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. दिवा परिसर आणि त्या बाजूच्या 14 गावांचा विजेचा प्रश्न तत्काळ सोडवा,अन्यथा मुंबई- पुणे महामार्ग रोखून महावितरणच्या अधिकार्यांची झोप उडवू, असा इशारा ठाण्याचे उपमहापौर, शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी दिला.
मुसळधार पाऊस सुरू असतानाही हजारो नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. भारत गिअर कंपनीजवळील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. सभापती स्थायी समिती राम रेपाळे, ठाण्याचे उपमहापौर,शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी, दिव्यातील सहा नगरसेवक, सर्व शाखाप्रमुख, कार्यकर्ते आणि नागरिक या मोर्चाला एकवटले होते. दिवा महोत्सव मैदानात नागरिक एकत्र झाले होते. या मोर्चाला संबोधून बोलताना मढवी यांनी प्रसंगी मुंबई- पुणे महामार्गावरील ठप्प करू, असा इशारा दिला. आम्ही जर रेल्वे बंद पाडून केंद्रीय मंत्र्यांनाही इथे आणू शकतो, तर महामार्ग रोखून महावितरणच्या अधिकार्यांची झोप उडवणे आमच्यासाठी अवघड नाही, असे त्यांनी सुनावले. दिवा शहरातील दोन्ही रिक्षा युनियन, व्यापारी संघटना,फेरीवाला संघटना यांनीदेखिल दिवा बंदची हाक दिली होती व ते मोर्च्यात सहभागी झाले होते.
मागण्या – दिवा शहरातील वारंवार खंडीत होत असलेल्या वीज समस्येवर उपाययोजना करणे, चुकीचे देयक, चुकीचे रिडींग, नादुरुस्त वीज मीटर, अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर न बसविल्यामुळे ओव्हर लोडमुळे ट्रान्सफॉर्मर फेल होऊन बिघाड होतो पर्यायी ट्रान्सफॉर्मरसाठी किमान दोन दिवसाचा कालावधी जातो, उच्चदाबाच्या व कमी दाबाच्या जीर्ण झालेल्या कंडक्टर वायर बदलणे आवश्यक असून व अतिरिक्त नवीन एल टी नेटवर्क टाकणे गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कंडक्टर तुटून जीवितहानी देखिल झालेली आहे. केबलचा तुटवडा व आवश्यक त्या साहित्याचा अभाव, पालचा 22 केव्हीचा फिडर दिवा शहरासाठी आणणे आवश्यक आहे. दिवा स्टेशन ते आगासन रेल्वे फाटक, स्टेशन रोड ते मुंब्रा देवी कॉलनी,दातिवली चौक ते दातिवली रेल्वे फाटक येथील विद्युत वाहिन्या भुमिगत करणे, नादुरुस्त तसेच धोकादायक जुने विद्युत पोल बदली करणे, गोठेघर फिडर कार्यान्वित करणे, दिव्याकरिता नवीन सबब डिव्हिजन निर्माण करुन उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांची नियुक्ती करणे तसेच इतर कर्मचाऱ्यांसमवेत आऊट सोर्सिंग कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करणे. अशा असंख्य मागण्या दिवेकरांच्या वीजेच्या समस्यापासून मुक्त होण्यासाठी आहेत.
ठाण्याचे उपमहापौर, शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी – दिव्याकरिता नवीन सब डिव्हिजन निर्माण करुन उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांची नियुक्ती करण्यास वेळ लागेल त्या आधी आठवड्यातून 2 वेळा महावितरणचे अधिकारी दिव्यात चुकीचे देयक,चुकीचे रिडींग, नादुरुस्त वीज मीटर यासाठी बसतील. तर पालचा 22 केव्हीचा फिडर 1 महिन्यात परवानगी घेऊन सुरु होईल. तसेच दिव्यात 5 नवीन अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर लावण्यात येतील. अशा मागण्या महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून मान्य झाल्या. वीजेच्या समस्यांनी दिवेकरांना ग्रासलेले असल्यामुळे निषेध मोर्चाला त्यांचा उत्स्फुर्त पाठिंबा होता.
PHOTO GALLERY