डोंबिवली : ( शंकर जाधव) रेल्वे स्टेशन बाहेरील मधल्या पुलाच्या बाहेर अनधिकृतपणे रिक्षा वॉशिंग सेंटर उघडल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे रिक्षावाले रेल्वेच्या स्वयंचलीत जिन्याच्या इथून पाईप आणून आपली रिक्षा धुत असल्याचे दिसून आले आहे.
कल्याण, डोंबिवली शहर आणि 27 गावांमध्ये पिण्यासाठी पाणी मिळणे मुश्कील झालेले असताना 27 गावांमधून गेलेल्या एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिन्यांना छिद्र पाडून चोरीच्या नळजोडण्या घेऊन त्याद्वारे ढाबे, हॉटेल्स, वाहने धुण्याची गॅरेज चालविण्यात येत असल्याचा प्रकार अंबरनाथ ते शिळफाटा चौक या दहा किलोमीटरच्या जलवाहिन्यांच्या रस्त्यावर सुरू आहे. हे चित्र या भागात सर्वत्र पहावयास मिळत असते. सरकारी जलवाहिनीतून चोरीछुपे पाणी चोरून या पाण्याचा खासगी वाहने धुण्याचे लोण आता शहरातही पोहोचले आहे. डोंबिवलीच्या रेल्वे स्टेशनला जोडलेल्या जलवाहिनीला पाईप जोडून त्या पाण्याचा वाहने, विशेषतः रिक्षा धुण्यासाठी वापर होत असल्याचा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आला आहे. या संदर्भात रेल्वेचा अधिकारी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाला नसल्याने अशा वॉशिंग सेंटर आणि संबंधीत रिक्षावाल्यांवर काय कारवाई करणार हे कळू शकले नाही.