अंबरनाथ दि. १२ : राज्यात सेना भाजपमध्ये इनकमिंग जोरात सुरू असतांना विधानसभा निवडणूक सेना भाजप स्वतंत्र लढतील अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. त्याचा प्रत्ययही सेना भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्या वरून येतोय. अंबरनाथ येथील कृष्णा मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या भाजपा पदाधिकारी बैठकित अंबरनाथ विधानसभा मतदार संघात सेनेचे डॉ. बालाजी किणीकर हे विद्यमान आमदार असताना अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाकडे वळवून घ्यावी, अशी मागणी यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. भाजपची जशी जशी ताकत वाढत आहे तस तसे प्रत्येक जागेवर भाजप आपला अधिकार दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. कृष्णा मंगल कार्यालय मध्ये संपन्न झालेल्या बैठकीस भाजप शहराध्यक्ष भरत फुलोरे, पूर्णिमा कबरे, किसन तारमळे, कृष्णा रसाळ पाटील, सलीम चौधरी आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांची आणि शहरातील भाजप कार्यकर्त्यांची ही भावना लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचली जाणार असल्याची माहिती यावेळी शहराध्यक्ष भरत फुलोरे यांनी सांगितले.
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना राज्यात सत्ताधारी शिवसेना आणि भाजप तिच्या पातळीवर वाटाघाटी करत आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातले इच्छुक यांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकमेकांना भेटले होते. त्यामुळे त्या वेळी पराभूत झालेले उमेदवार पुन्हा विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे आमदार डॉ बालाजी किणीकर यांचा थोड्या फरकाने विजय झाला होता. तर त्यावेळी त्यांच्याविरुद्ध भाजपतर्फे निवडणुकीच्या रिंगणात असलेले राजेश वानखेडे पराभूत झाले होते. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील दरी वाढत गेली होती. सत्तेत असूनही दोघांनी एकमेकांना लक्ष करणे सोडले होते. त्याच वेळी स्वबळावर निवडणूक लढवण्याची दृष्टीने दोन्ही पक्षांनी विद्यमान आमदारांच्या विरोधात आपल्या पक्षाचे उमेदवार तयार केले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या इच्छुकांचा हिरमोड झाला होता. त्यानंतरही अद्याप निर्णय होत नसल्याने दोन्ही पक्षातील इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. दोन्ही पक्षांनी आपापल्या पक्षातील विविध मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर केली जाणार आहे. मात्र निर्णय होत नसल्याने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशाच अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा भाजपसाठी सोडावा अशी मागणी येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे. बुधवारी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक यांनी अंबरनाथ येथील कृष्णा मंगल कार्यालय येथे बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत भाजपची विधानसभा क्षेत्रात वाढलेली ताकद याची चाचपणी करण्यात आली. भाजपच्या पक्ष विस्ताराच्या कार्यक्रमात बूथ निहाय कार्यकर्ते आणि पदाधिकारी नेमले गेले असून त्यांच्या माध्यमातून पुढील विधानसभा भाजपच्या चिन्हावर लढण्यास भाजपला नक्की यश मिळणार आहे असा सूर यावेळी पदाधिकाऱ्यांनी लावला. विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. विधानसभेची जागा भाजपने लढण्यास त्याचा फायदा नगरपरिषद निवडणुकीत भाजपला होऊ शकतो. त्यामुळे नगरसेवकांनी संख्या वाढून अंबरनाथ नगरपरिषदेवर भाजपाचा नगराध्यक्ष विराजमान होऊ शकतो. त्यामुळे येत्या दिवसात युतीच्या वाटाघाटींमध्ये जागांची अदलाबदल केल्यास अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाकडे वळवून घ्यावी, अशी मागणी यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष भरत फुलोरे, पूर्णिमा कबरे, किसन तारमळे, कृष्णा रसाळ पाटील, सलीम चौधरी आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांची आणि शहरातील भाजप कार्यकर्त्यांची ही भावना लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचली जाणार असल्याची माहिती यावेळी शहराध्यक्ष भरत फुलोरे यांनी दिली.
भाजपात इच्छुकांची गर्दी
गेल्या निवडणुकीत निसटता पराभव झाल्याने भाजपच्या जिव्हारी लागला होता. त्यानंतर भाजपात अनेक इच्छुक तयार झाले. यात आता भाजप उद्योग प्रकोष्ठचे अध्यक्ष सुमेध भवार, पराभूत उमेदवार आणि नगरसेवक राजेश वानखेडे, मंजू धल, प्रदीप वाघमारे, दिलीप जगताप, सुबोध भारत आणि शशिकांत कांबळे यांचा समावेश आहे.