स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी घेतला आढावा
ठाणे दि २६ सप्टेंबर २०१९ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताचे औचित्य साधत ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टिक बंदीचा ठराव करण्यात आला असून २ ऑक्टोबर रोजी गावातील प्लस्टिक कचरा संकलित करून तालुक्याच्या संकलन केंद्राच्या ठिकाणी जमा करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी केले आहे.
स्वछता हि सेवा उपक्रमाच्या आढावा बैठकी दरम्यान त्यांनी स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. गुरुवार २५ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक पार पडली.
जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा उपक्रमा अंतर्गत विविध स्वछतेचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून राबिवण्यात येणारा हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व स्तरावर राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी जिल्हास्तरीय ते ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीत उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( स्वच्छता व पाणी ) छायादेवी शिसोदे उपस्थित होत्या.
स्वच्छता ही सेवा हा उपक्रम 11 सप्टेंबर सूरु झाला आहे. 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त विविध उपक्रम तसेच सामूहिक श्रमदान करण्यात येणार आहे. तालुक्यात ग्रा.प. मध्ये प्लास्टिक बंदी ठराव , प्लास्टिक , काच , लोखंड , कागद यांचे संग्रह करुन त्याचे वर्गीकरण करून महाराष्ट्र प्रदुषण बोर्डला कळवणे, ग्रामपंचायत मध्ये ओल्या कच-याचे खतामध्ये रुपांतर करणे, एक खड्याच्या शौचालयाचे दोन खड्ड्यात रुपांतर करणे, खड्डा भरला असेल तर तो उपसणे, चेंबर, दरवाजा , टाकी दुरुस्त करणे व त्याचा शाश्वत वापर करणे, प्रचार-प्रसार करणे, हात धुण्याबाबत प्रशिक्षण घेणे, सॅनिटरी मशिनचे उद्घाटन करणे व वापराबाबत मार्गदर्शन करणे, गावात सांडपाण्यासाठी शोषखड्ड्यांची व सार्वजनिक पाझर खड्याची बांधकामे करणे. आदी कामे या काळात करण्यात येत आहेत. यावेळी गटविकास अधिकारी , कार्यक्रम अधिकारी , गटसमन्वयक, समुह समन्वयक व जिल्हा पाणी व स्वच्छता कक्ष यामधील सर्व सल्लागार उपस्थित होते.