ठाणे दि १३ नोव्हेंबर २०१९ : ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाने शहापूर तालुक्यातील डेगनमाळ येथे मंगळवारी वनराई बंधारा बांधला. मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून वनराई बंधारा हा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. जिल्ह्यातील पाचही तालुक्यात विविध विभागाच्या माध्यमातून वनराई बंधारे बांधले जात आहेत.
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हा ग्रामीण भागातील जनेतला शुद्ध-मुबलक पाणी मिळाव यासाठी विविध कल्याणकारी पाण्याच्या योजना राबविणारा महत्वपूर्ण विभाग आहे. या विभागाचे कार्यकारी अभियंता एच.एल.भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या शेतकरी, वन्यप्राण्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या विभागातील जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय उप अभियंता, शाखा अभियंता यांच्या सामुहिक श्रमदानातून हा बंधारा बांधण्यात आल्याचे श्री. भस्मे यांनी सांगितले.