मुंबई : उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपमधून निलंबित झालेला आमदार कुलदीप सिंह सेंगरला दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने दोषी ठरवून आज आपला निर्णय दिला. या निर्णयामुळे पीडित मुलीला काही प्रमाणात न्याय मिळाला आहे. मात्र यामुळे स्वतःला सर्वांत मोठा राष्ट्रीय पक्ष समजणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा पार्टी विथ डिफरनस आता समोर येऊ लागला असल्याची खरमरीत टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली आहे.
उन्नाव बलात्कार प्रकरणात कुलदीप सेंगर दोषी ठरला आहे. इतके वर्षे राष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या मागे भाजप देशाची दिशाभूल करत आला आहे. आता ५६ इंचाची छाती असलेले पंतप्रधान व भाजपचे नेते आपल्या पक्षातील अशा नेत्यांविरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवतील का? असा सवाल देखील मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. भाजपचे नेते पाहत असलेलं असं स्वप्न राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांनी देशासाठी कधीच पाहिले नव्हतं. देशातील जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजपने देशाची आणि देशातील महिलांची जाहीर माफी मागावी अशी मागणी मनीषा कायंदे यांनी केली आहे.