मुंबई, दि. १० : दिग्गजांनी आणि साहित्यिकांनी हिंदी भाषेची अविरत साधना केल्याने आज आपल्याला ती गौरवास्पद वाटते. आपण भाग्यशाली आहोत की, आज आपण मोठ्या प्रमाणात हिंदी साहित्याची अनुभूती घेऊ शकतो. देशातील प्रत्येक भाषेचे महत्व अनन्यसाधारण असून हिंदी भाषेने आपले विशेष स्थान बनविले असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
आज विश्व हिंदी भाषा दिनानिमीत्त हिंदी पत्रकार संघाने मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणातील कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे “बॉलीवुड आणि हिंदी” या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.
दरम्यान, हिंदी भाषेतून पत्रकारितेला योगदान देणारे पत्रकार हरिष पाठक, अश्विनी मिश्र, अभिलाष अवस्थी, प्रितम त्यागी, प्रवीण जैन आदींना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, साहित्यकार बाबुराव विष्णु पराडकर या मराठी व्यक्तीने पहिल्या हिंदी वर्तमानपत्राचे संपादन केले. हिंदी भाषा प्रदेशापुरती मर्यादित नसून, आज देशाच्या सिमा ओलांडून जगभर बोलली जाते. याचे श्रेय हिंदी साहित्य आणि बॉलीवुडला जाते. आज हिंदी मोठ्या प्रमाणात संपर्क भाषा बनली असून, अनेक वर्षे दिग्गज आणि साहित्यिकांनी केलेल्या भाषेच्या साधनेमुळेच भाषेला हा गौरव प्राप्त झाला आहे. हिंदी साहित्य विस्तार आणि प्रसारासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. राष्ट्रीयस्तरावर प्रचारित असलेल्या हिंदी भाषेचा गौरव वाढविण्याचेच कार्य सर्वांनी करावे. हिंदीचा सर्वदूर प्रसार करण्यासाठी आणि भाषा अधिक वृद्धिंगत करण्यासाठी कार्य आणि संशोधन करणे गरजेचे असल्याचेही राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे हिंदी विभागाध्यक्ष डॉ.करूणाशंकर उपाध्याय, अभिनेता दया शंकर पांडेय, फिल्म लेखक संजय मासुम, वरिष्ठ टीव्ही पत्रकार डॉ.संजय प्रभाकर यांनी हिंदी भाषा आणि साहित्यावर आपले विचार मांडले. व्यासपीठावर मुंबई हिंदी पत्रकार संघाचे आदित्य दुबे, महासचिव आदित्य सिंह कौशिक, उपाध्यक्ष विनोद यादव, सचिव अभय मिश्र आदी उपस्थित होते.