डोंबिवली ( शंकर जाधव ) : दिल्लीत यूपीएससी स्पर्धा परीक्षा तयारीसाठी गेलेले आणि लॉकडॉऊनमुळे अडकलेले महाराष्ट्रातील १ हजार ६०० विद्यार्थी काल रात्री महाराष्ट्रात परतले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर रेल्वे मंत्रालयाने सोडलेल्या विशेष ट्रेनद्वारे हे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रात स्वगृही परतले.
गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्ली येथे आयएएस आयपीएस सारख्या मोठ्या हुद्द्याच्या शिक्षणासाठी महाराष्ट्रातील काही विद्यार्थी हे दिल्ली येथे गेले होते. परंतु लॉक डाऊन झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागले. आणि या विद्यार्थ्यांनी आपल्या राज्यात परतण्यासाठी विविध राजकारण्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.मात्र पदरी निराशा पडल्याने अखेर त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधत महाराष्ट्रात परतण्यासाठी विद्यार्थ्यांनी साकडे घातले होते. त्यानंतर खासदार शिंदे यांनीही राज्य सरकार तसेच केंद्र स्तरावर पाठपुरावा करत या विद्यार्थ्यांना राज्यात परत येण्याचा मार्ग मोकळा करून दिला.काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील ८८ विद्यार्थी उतरले. या सर्वांना आपापल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातून खासगी, टॅक्सी आणि एसटी बसेसचीही सोय करण्यात आली होती. या सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्या सर्वांच्या हातावर होम कॉरंटाईनचे शिक्के मारण्यात आले.खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपण सुरुवातीपासून या मुलांच्या संपर्कात होतो. या मराठी मुलांची परतण्याची व्यवस्था करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव अभय यावलकर, राज्य शासनाचे सचिव नितीन करीर, दिल्लीतील महाराष्ट्राचे सनदी अधिकारी एस सहाय्य या सर्वांच्या प्रयत्नाने हे सर्व विद्यार्थी आज महाराष्ट्रात परतल्याबाबत समाधान व्यक्त केले. मात्र देशाच्या या भावी सनदी अधिकाऱ्यांना दिल्ली सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या वागणुकीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान दिल्ली ते महाराष्ट्रच्या या प्रवासात रेल्वेकडून अत्यंत वाईट अनुभव आल्याची प्रतिक्रियाही या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. स्क्रिनिंग करण्यापासून ते रेल्वे प्रवासात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यापर्यंत कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याची माहिती देत यावरही खासदार डॉ. शिंदे यांनी तातडीने लक्ष घालून आमच्यासाठी खाण्याची व्यवस्था केल्याची माहिती एका विद्यार्थिनीने दिली. तसेच या सर्व विद्यार्थ्यांनी खासदार शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आभारही मानले.