डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली स्थानकात रेल्वेची आरक्षण खिडकी सुरू करण्यात आली नसल्याने बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना रेल्वेचे आरक्षणाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.
डोंबिवली शहरात महाराष्ट्रातील कोकण, जळगाव, सातारा, कोल्हापुर येथील अनेक नागरीक राहतात. या शिवाय उत्तर प्रदेश , पश्चिम बंगाल , बिहार येथून आलेले नागरीकही मोठ्या संख्येने राहतात. या नागरिकांचे पोट हातावर आहे. त्यामुळे संचारबंदी लागु झाल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांंना सतावू लागला. या मंडळींनी पुन्हा गावी परतण्याचा निर्णय घेतला. मात्र संकेतस्थळावरून आरक्षण कसे करावे याची माहिती नसल्याने या सर्व नागरिकांनी डोंबिवली स्थानक गाठले. मात्र डोंबिवली स्थानकात आरक्षण खिडकीच सुरू नसल्याने या सर्व नागरिकांना माघारी फिरावे लागले. त्यानंतर सोमवार पासून बरीच कार्यालये सुरू होणार असल्याचे कळताच या कामगारांना आरक्षण खिडकी सुरू होईल असे वाटले. मात्र अद्यापही खिडकी सुरू झाली नसल्याचे पाहताच या नागरिकांचा हिरमोड झाला. बाहेरून आरक्षण काढून घेतले तर पैसे अधिक लागतात. त्यामुळे बाहेर ट्रॅव्हल्स ऑन्ड टुरिझमच्या दुकानातील आरक्षण खिडकीवर जाणे शक्यच नसल्याची माहिती या नागरिकांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली. विशेष म्हणजे बदलापुर सारख्या छोट्या स्थानकात देखील आरक्षण खिडकी सुरू झाली असताना डोंबिवली येथील आरक्षण खिडकी का सुरू झाली नाही असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. इतकेच नव्हे तर काही कामगार रोज खिडकीजवळ जाऊन खिडकी सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत. संचारबंदीच्या काळात खिडकीवर काम करणारे रेल्वे कर्मचाऱ्यांंनी आरक्षण खिडकी उघडून साफसफाई केली होती. त्यामुळे नागरिकांना आशा निर्माण झाली होती. मात्र त्यावेळी देखील संकेतस्थळ सुरू होण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली होती.विशेष म्हणजे रेल्वेच्या कर्मचा ऱ्यां साठी खास रेल्वे सोडण्यात येत असतानाही कर्मचारी कामावर रूजु नसल्याने खंत व्यक्त करण्यात येत आहे.