भिवंडी, 18 ऑक्टो, संतोष पडवळ : भिवंडी तालुक्यातील माणकोली-अंजूर रोडवर सुसाट वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील विश्वास भोईर (वय – 32) आणि नीलकंठ भोईर (वय – 34) या सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की तरुणांच्या शरीराची अवस्था छिन्न-विछन्न झाली. त्यामुळे त्यांनी जागीच प्राण सोडले. अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोनही तरूण आधी रेतीचा व्यवसाय करत होते. मात्र लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाल्याने ते गोदामातील वाहनात माल भरणे आणि खाली करण्याचे काम करत होते. अशातच एका ट्रकमधील माल खाली करण्यासाठीत्यांना फोन आल्याने ते दुचाकीवरून निघाले.
गाडी रिकामी करण्यासाठी जात असताना वीटा घेवून जाणाऱ्या ट्रकने या दोघा भावांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यावेळी दोघेही ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने चिरडले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे भारोडी गावावर शोककळा पसरली आहे. हे दोघे भारोडी गावातील राहणारे आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून ट्रकचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, या रोडवर अवजड वाहने वेगात जात असल्याने नेहमीच अपघात होत असतात. त्यामुळे या रोडवर गतिरोधक बनवण्याची मागणी नागरिक करत आहेत.