ठाणे दि. 17 : जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत विविध विभागांनी सन २०-२१ साठी घेतलेली विकास कामे विहित वेळेत पूर्ण होतील याची दक्षता सर्व संबंधित विभागांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज दिलेत.
जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उप योजना, अनुसूचित जाती योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त,बलभीम शिंदे यांचेसह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री नार्वेकर पुढे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेमधून जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी विभागांच्या मागणीनुसार निधीची तरतुद करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संबंधित विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी घेऊन निधीचे वितरण करण्यात आले आहे. तर अनेक विभागांनी अद्यापही निधी मागणीचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर केलेले नाही. त्यांनी तात्काळ सुधारित प्रस्ताव सादर करावेत. जे विभाग लवकरात लवकर तांत्रिक मंजूरी, प्रशासकीय मान्यता घेऊन निधी मागणीचे प्रस्ताव सादर करणार नाही, त्यांना देण्यात आलेला निधी इतर विभागांना वर्ग करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांवर निश्चित करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी सर्व विभागनिहाय उपलब्ध निधी आणि प्राप्त प्रस्ताव याबाबत सविस्तर माहिती दिली.