डोंबिवली ( शंकर जाधव ) : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजत असतानाच नवी मुंबई पालिकेच्या जवळ येणाऱ्या १४ गावांमध्ये दोन गट पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. १४ गावात निवडणूक लढविणार आणि जिंकणार असा निर्धार शिवसेनेने केला आहे.तर भाजप नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप शिवसेनेने पत्रकारांशी बोलताना केला.
१५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भूमिकेबाबत पत्रकारांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली. दहिसर मोरी येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठक पार पडली. या बैठकीत माजी सरपंच भरत भोईर, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, उपविभाग प्रमुख बाळाराम पाटील, पिंपरी उपशाखा प्रमुख मंगेश जाधव, उवासेना दहिसर विभाग सचिव सचिन जाधव,पंचायत समिती सदस्य भरत भोईर आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळीमाजी सरपंच भरत भोईर म्हणाले, भाजपचे पदाधिकारी बहिष्कार टाकणार असल्याचे सांगत जनतेचीदिशाभूल करत आहे. काहीही झाले तरी शिवसेना ही निवडणूक लढवणारच. यासंदर्भातचा निर्णय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे घेतीलच मात्र सध्या तरी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाच्या ठरणार असल्याने सर्वाचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.