जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे नव मतदारांना आवाहन
राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा
ठाणे, दि.25 :- मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. मतदान करताना आपली सद्सद् विवेक बुध्दी जागृत ठेवून मतदान करुन लोकशाही प्रक्रिया बळकट करायला हवी. यासाठी सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरुक मतदार बना असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नवं मतदारांना केले. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने जिल्हा नियोजन सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गानहिरा हेमा उपासनी, दिवाणी न्यायाधिश श्री. देशपांडे अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी उपेंद्र तामोर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. नार्वेकर म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने तंत्रज्ञानाचा वापर ज्या नवनवीन सुविधा बनविल्या त्या सुविधांचा आपण मोठ्या प्रमाणात वापर करावा. ज्यांचे वय 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्षे पूर्ण झाले आणि ज्यांनी आपले नाव मतदारयादीत नोंदविले आहे, असे नवीन मतदार येणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. मतदान हा आपल्याला घटनेमुळे मिळालेला विशेष हक्क आहे. त्याबरोबरच मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्यसुध्दा आहे. नवीन मतदारांनी आपल्या घरातील नागरिकांची नावे मतदारयादीत आहेत किंवा नाहीत हे तपासून घ्यावे. तसेच मतदानाच्या वेळी मतदान करण्यासाठी त्यांना आग्रह करावा, असे सांगून ज्यांचे मतदारयादीत नाव नसेल अशा नागरिकांनी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तसेच
तालुक्यातील संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून मतदार यादीत आपले नाव नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी उपस्थितांना केले.
यावेळी दिवाणी न्यायाधिश श्री. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी वेदेही रानडे यांनी मतदानाचे महत्व विषद केले.
यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते नवीन मतदारयादीत नोंदणी झालेल्या नवमतदारांना मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच मतदार नोंदणी प्रक्रियेत उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.