डोंबिवली ( शंकर जाधव ) : मनसे स्थापनेपासून पक्षासाठी एकनिष्ठ काम करणारे मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासह माणसे पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मलबार हिल येथील नंदनवन येथे जाहीर प्रवेश केला. यामुळे डोंबिवलीतील मनसेमध्ये मोठे खिंडार पडले आहे. विशेष म्हणजे तोंडावर आलेल्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश केल्याने मनसेला राजकीय धक्का सहन करावा लागणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत कल्याण ग्रामीण मधून मनसेचे आमदार राजू पाटील निवडून आल्याने विधानसभा निवडणुकीत मनसेचे एक खाते उघडले गेले. मात्र त्यानंतर दोन वर्षातच डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी आणि उपाध्यक्ष राजेश कदम यांनी मनसेच्या इंजिंमधून उतरून शिवधनुष्य हाती घेतले आहे.
यासंदर्भात राजेश कदम यांना विचारले असता या वृत्ताला दुजोरा देत शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संयमी वृत्ती व राजकीय विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले. मनसेतर्फे भरपूर गोष्टी मिळवून दिल्या त्यामुळे मनसे पक्षावर कोणतीही नाराजी नसल्याचे नमूद केले. राजेश कदम यांच्यासह अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबाबत मनसेचे डोंबिवलीचे माजी शहर अध्यक्ष मनोज घरात यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी राजकीय स्वार्थापोटी कदम यांनी पक्ष सोडला आहे.
मनसेमध्ये यापूर्वी देखील अनेक नेत्यांनी अशाच प्रकारचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्या जाण्याने काही फरक पडणार नसून शिवसेनेमधील अनेक पदाधिकारी आपल्याकडे इच्छुक असल्याचे त्यांनी नमूद केले.