डोंबिवली ( शंकर जाधव ) : २७ गावातील तीव्र पाणी टंचाई बाबत मनसे आमदार प्रमोद ( राजु ) पाटील यांनी ट्विट केल्यानंतर मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने डोंबिवलीतील एमआयडीसी कार्यालयात कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांची भेट घेतली.यावेळी देशमुख होम्स,सांगर्ली,सागांव येथील नागरीकही उपस्थित होते. यावेळी मनविसे शहरअध्यक्ष मिलींद म्हात्रे,शहरसंघटक हरीश पाटील,ओम लोके,रविंद्र गरुड,संजय सरमळकर,देशमुख होम्स मधील वंदना सोनावणे,अमरसेन चव्हाण आदी उपस्थित होते.फेब्रुवारी पर्यंत सुरळीत असणारा पाणी पुरवठा अचानक मार्च पासुन का अनियमित झाला ? मुख्य जलवाहिनी वरील प्रेशर का कमी ठेवले जाते ? पालिकेचे पाणी खाते व एमआयडीसी अधिकारी वर्गाच्या बैठका का होत नाहीत ? टॅंकर माफियांमुळे कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येतोय का ? आम्ही नियमीत पाणी बील भरुनही आमच्यावर अन्याय का ?असे अनेक प्रश्न यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना विचारले.
यावेळी कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याकडुन मिळालेल्या उत्तराने उपस्थित नागरिक संतापले होते.लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास येणाऱ्या होळीला अधिकारी वर्गाचे तोंड काळे करु असा इशारा यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने दिला.प्रतिकात्मक निषेध म्हणुन यावेळी काळ्या रंगाचा डबा अधिकाऱ्यांना भेट देण्यात आला.त्याच बरोबर सदर पाणीटंचाईचा विषय कायमचा मार्गी लावण्यासाठी मनसे तर्फे लवकरच एमआयडीसी आणि पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची संयुक्त बैठक घेण्यात येईल असे शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी यावेळी सांगितले.