मुंबई, 01 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरले आहे. राज्याची राजधानी मुंबईत शुक्रवारपासून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. मुंबईच्या लोकलमध्ये पुन्हा एकदा अत्यावश्यक सेवा म्हणून कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईमध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. त्यामुळे कडक निर्बंध लावले जाणार आहे. धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद करण्याचे संकेत पेडणेकर यांनी दिला.हॉटेलमध्ये 50 टक्के उपस्थितीने चालवले जाणार आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबईची लोकलमधून पुन्हा एकदा फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहितीही पेडणेकर यांनी दिली.
मॉल, थेटर पूर्णपणे बंद करणार आहोत, खाजगी ऑफिसेस 2 शीफ्टमध्ये चालवण्यावर भर देण्याचे आमचे आवाहन आहे. दुकानं आणि बाजारपेठा एक दिवस आड सुरू ठेवले जातील, असे संकेतही महापौरांनी दिले आहे.