ठाणे, दि. २२ (प्रतिनिधी) : मासुंदा तलावाजवळ वृक्ष कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेला महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कारणीभूत असून, मृत रिक्षाचालक व प्रवाशाला दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे. वर्षातून किमान दोन वेळा वृक्षांच्या फांद्यांची छाटणी आवश्यक असताना, वृक्ष प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना घडली आहे, असा आरोप श्री. वाघुले यांनी केला आहे.मासूंदा तलावाजवळ बुधवारी रात्री कोसळणाऱ्या वृक्षाखाली सापडून रिक्षातील रिक्षाचालक व एका प्रवाशाचा मृत्यू झाला. शहरातील बहुसंख्य रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे होत असल्यामुळे झाडांच्या मुळांना पसरण्यास जागा राहत नाही, असा खुलासा नेहमी केला जातो. त्यामुळे अशा वृक्ष व झाडांचे वर्षातून दोन वेळा सर्वेक्षण करण्याची गरज आहे. त्यानंतर धोकादायक महाकाय वृक्ष व धोकादायक वृक्षांच्या फांद्या वेळोवेळी कापण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडे वृक्ष प्राधिकरणाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळेच मासूंदा तलावाजवळची दुर्घटना घडली, असा आरोप श्री. वाघुले यांनी केला.
या दुर्घटनेला सर्वस्वी महापालिका व वृक्ष प्राधिकरण जबाबदार आहे. या दुर्घटनेत दोघा जणांचा बळी गेल्यामुळे दोन कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. या दुर्घटनेची जबाबदारी महापालिकेने स्विकारून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.