मुंबई, दि. 28 : समाजकारण-राजकारणातील दोन पिढ्यांचे मार्गदर्शक असे ज्येष्ठ नेतृत्व माजी राज्यमंत्री, माजी खासदार एकनाथराव गायकवाड यांच्या निधनामुळे हरपले आहे. त्यांच्या नेतृत्वाची पोकळी जाणवत राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते एकनाथराव गायकवाड यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणतात, समाजकारणात रमलेल्या ज्येष्ठ नेते गायकवाड यांनी दोन पिढ्यांसाठी मार्गदर्शक असे काम केले आहे. धारावी आणि मुंबईतील जनमानसाशी जोडून घेऊन त्यांनी विधिमंडळात आणि संसदेतही उत्कृष्ट असे काम केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांची श्रद्धा होती. त्यांचा उत्तम जनसंपर्क होता. लोकाभिमुख विकासकामांना चालना देताना त्यांनी सर्वसमावेशक राजकारणाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या निधनामुळे दोन पिढ्यांसाठी मार्गदर्शक असे ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे. त्यांची पोकळी निश्चितच जाणवत राहील. ज्येष्ठ नेते एकनाथराव गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली.