ठाणे

तोकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या आपत्कालीन परिस्थितीचा घेतला आढावा

जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या सर्व महानगरपालिकांना सूचना

ठाणे:- तोकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी आज जिल्ह्याधिकारी कार्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन जिल्ह्यातील  आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी एमएमआर क्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला फोन करून त्यांनी तेथील परिस्थितीबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. 
तोकते चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत नाही तोपर्यंत या जिल्ह्यांना त्याचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडल्या आहेत. नवी मुंबईत दुचाकीवर झाड कोसळल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर उल्हासनगरमध्ये एका रिक्षेवर झाड कोसळल्याने दोन प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. पालकमंत्री शिंदे यांनी उल्हासनगर मनपा आयुक्तांना फोन करून या जखमींना वेळेत चांगले उपचार मिळतील, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. 
मीरा-भाईंदर क्षेत्रातील उत्तनच्या समुद किनाऱ्यापासून १० नॉटिकल मैलांवर एक जहाज  भरकटले होते. या जहाजावर ६ खलाशी अडकले आहेत. सध्या हे जहाज तटरक्षक दलाच्या संपर्कात असून वादळाचा जोर ओसरल्यावर ते उत्तनच्या किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी दिली. 
जिल्ह्यातील एकूण परिस्थिती तूर्तास नियंत्रणात असली तरी जिल्ह्याधिकारी श्री. राजेश नार्वेकर या परिस्थितीचा आपत्ती नियंत्रण कक्षातून सातत्याने आढावा घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रत्येक पालिकेच्या अधिकाऱ्यांना आपत्कालीन पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!