मोखाडा (दीपक गायकवाड ): पालघर जिल्ह्य़ातील अति दुर्गम भाग समजला जाणा-या मोखाडा तालुक्यात विजेचा लपंडाव चालुच आहे. दरवर्षी प्रमाणे पावसाळापूर्वी जी दुरुस्तीचे कामे करायची असतात ती फक्त आणि फक्त कागदावरच दाखवून ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने बिल काढून काम झाल्याचे दस्तूरखुद्द महावितरणच्या गोटातच दबक्या आवाजात बोलले जात आहे .
पावसाळापूर्व दुरुस्तीचे कामाला ठेका दिला जातो. त्यामधे खराब (सडलेले) पोल बदली करणे , जीर्ण वायरी बदलणे , फुटलेल्या पीना-डिस्क बदलणे, खराब डिपी बदलणे, लाईनवर आलेली झाड तोडणे ही कामे अजुनही झालेली नाहीत बर्याच ठिकाणी पोल वाकलेत काही ठिकाणी बुंध्याला होल पडलेत, वायरी तुटतात, दरवाजे नसलेल्या डिप्या लोंबकळत उघड्या आहेत, ट्रान्सफरचे तेल गळतं व लाईनवर झाडे आलेली आहेत. ठेकेदारांचे तिथल्या वायरमन नाव सुद्धा माहीत नसतेएखादा पोल पडला तर उभा करायला दोन दिवस लागतात पर्यायाने अनेक गावांना विजेपासून पारखे रहावे लागते. तालुक्यातील काही गावे तर अतिशय दुर्दैवी असून पावसाळ्याच्या सुरुवातीला विज गायब झाली तर दिवाळीतच अशा गावांचा वीजपुरवठा सुरळीत करता येतो ही तालुक्यातील शोकांतिका आहे.
ठेदाराकडे वेळेवर सामान नसते जुनच सामान कुठुन तरी शोधायचे आणि करायचे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ठेकेदारच वेळेवर नसतात. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की दोन – दोन दिवस लाईट नसते.परंतू त्याबाबत कोणताही अंकुश लावला जात नाही.
खोडाळा विभागात असंख्य गावपाडे आहेत अतिदुर्गम ठिकाणी सेवा देतांना अत्यल्प कर्मचाऱ्यांना सेवा देतांना अक्षरशः रात्री अपरात्री तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात या ठिकाणी उप अभियंता नाही. लाईनमन नाही, कर्मचारी केवळ ३ त्यामुळे खोडाळा विभागातील गावांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर आदिवासी भागातील जीवनमान अत्यत जटिल होत असते. साथीचे आजार, सर्पदंश यासारखे गंभीर प्रकार सर्रास घडत असतात त्यात वीजपुरवठा खंडीत असला तर त्यात वाढच होत असते. त्यामुळे नेहमी सापत्न वागणूक मिळणा-या खोडाळ्याकडे महावितरणने जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.