डोंबिवली ( शंकर जाधव ) : भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या रुपाने ठाणे जिल्ह्याला प्रथमच केंद्रात राज्यमंत्रीपदावर प्रतिनिधीत्व मिळाले.खासदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीने कपिल पाटील यांना बहूमान मिळाला. कपिल पाटील यांच्याकडे गेल्यानंतर रखडलेल्या प्रश्नावर काहीतरी मार्ग निघेल, अशी आशा ग्रामस्थांना असते.त्यातूनच त्यांच्या ठाणे जिल्ह्यातील लोकप्रियतेत वाढ होत गेली.
भिवंडी तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात कपिल पाटील यांनी १९९२ मध्ये भिवंडी पंचायत समितीचे सदस्यत्व, १९९७ मध्ये सभापतीपद, २००२ मध्ये जिल्हा परिषद सदस्यत्व, जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापतीपद, उपाध्यक्षपद आणि शेवटी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अशी त्यांची चढती कमान होती. इंग्रजी शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्रात प्रथमच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी नर्सरी स्कूल सुरू झाल्या. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ठाणे जिल्हा परिषदेने यशवंत पंचायत राज अभियानात राज्य सलग दोन वेळा अव्वल क्रमांक पटकावला होता. कपिल पाटील यांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली. बॅंकेच्या योजना बचत गट व शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याबरोबरच सहकार सोसायट्यांमध्ये बॅंकेचे जाळे विणले. या कार्याबरोबरच बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे संचालक, राज्य विकास परिषदेचे सदस्य, राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या समितीचे चेअरमनपद आदी पदे भूषविली. तर भाजपाच्या स्तरावर ठाणे-पालघर विभागीय अध्यक्षपद आणि प्रदेश स्तरावर उपाध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. या काळात ठाणे व पालघर जिल्ह्यात भाजपाच्या पक्षविस्तारातही त्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे.
ठाणे व पालघर जिल्ह्याच्या २०१० च्या दशकातील राजकीय वर्तुळात कपिल पाटील यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यामुळेच नव्याने पुनर्रचित भिवंडी लोकसभा मतदारसंघात संभाव्य खासदार म्हणून कपिल पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, ती त्यांची संधी हुकली. परंतु, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ च्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी भिवंडी जिंकून इतिहास घडविला. लोकसभेतील अभ्यासपूर्ण भाषणे, मतदारसंघाबरोबरच देशभरातील विविध मुद्दयांकडे वेधलेले लक्ष, संसदीय समितीवर केलेली कामगिरी आदींमुळे त्यांना दुसऱ्या टर्ममध्ये भाजपा पक्ष प्रतोदपदाची जबाबदारी दिली गेली. अन्, आता दोन वर्षानंतर केंद्रीय राज्यमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. १२ पदरी ठाणे-भिवंडी बायपास, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग, एमएमआरडीएने ग्रामीण भागासाठी दिलेला निधी, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो आदी कार्य ही कपिल पाटील यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष आहे.
ठाणे जिल्ह्यात आगरी व कुणबी समाज मोठ्या संख्येने आहे. किंबहूना आगरी व कुणबी समाजाचे ग्रामीण भागातील राजकारणावर प्रतिबिंब पडते. मात्र, कपिल पाटील यांनी जात हा भेद न ठेवता आगरी व कुणबी समाजाबरोबरच आदिवासींसह इतर समाज एकत्र आणून भिवंडी लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये विजय मिळवून एक अनोखे सोशल इंजिनियरिंग घडविले होते. त्यामुळेच भिवंडीतील विजय हा भाजपाच्या दृष्टीने महत्वाचा ठरला. ठाणे-रायगड जिल्ह्यातील बहूसंख्य आगरी समाजातील ते पहिले केंद्रीय मंत्री ठरले आहेत. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त-भूमिपूत्र आणि लोकनेते दि. बा. पाटील हे न तुटणारे नाते. दिबांची स्मृती कायम राहण्यासाठी २०१६ मध्येच कपिल पाटील यांनी सर्वप्रथम लोकसभेत प्रस्तावित विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली होती. आता त्याच्या लढ्यात ते अग्रेसर आहेत.
दिवंगत आर. आर. आबांचे भाकित खरे ठरले
कपिल पाटील यांच्या उपस्थितीत २०१४ मध्ये झालेल्या कार्यक्रमाला तत्कालीन मंत्री आर. आर उर्फ आबा पाटील उपस्थित होते. त्यावेळी खासदार कपिल पाटील हे जिल्हा बॅंकेचे चेअरमन होते. मात्र, महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणात कपिल पाटील हे महत्वाची भूमिका बजावतील, असे भाकित आर. आर. आबांनी केले होते. कपिल पाटील यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते खरे ठरले आहे.