डोंबिवली ( शंकर जाधव ) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेप्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू केल्याचे जाहीर केले. परंतु त्यासाठी लसीकरणाचे ज्यांचे दोन डोस झालेले आहेत त्यांना प्रवास करायला मुभा देण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होत असल्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका किंवा संपूर्ण महाराष्ट्रात संथगतीने लसीकरणाची मोहीम सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक चाकरमानी लसीकरणापासून वंचित राहिलेले आहे, लाॅकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे रेल्वे प्रवास सुरू केला आहे, नव्या नियमामुळे सध्या लसीकरण केंद्रांवर तुफान गर्दी होत आहे, परंतु महापालिकेची लसीकरण केंद्र मात्र लस उपलब्धब नसल्यामुळे बंद आहे. अशी परिस्थिती संपूर्ण कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिसून येते.कमी प्रमाणात लसीचा पुरवठा होत असल्यामुळे लसीकरणाचा वेग अत्यंत संथगतीने सुरू आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने संबंधित पातळीवर पाठपुरावा करावा याकरिता शिवसेना डोंबिवली शहराच्यावतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांना निवेदन सादर केले.
याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख तात्या माने, कार्यालय प्रमुख सतीश मोडक आणि राजेश कदम उपस्थित होते.