अंबरनाथ तालुक्यातील अंगणवाडीसेविकांचे सामूहिकरीत्या मोबाईल वापसी आंदोलन
अंबरनाथ दि. २३ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : अंगणवाडीसेविकांना शासनाच्या वतीने शालेय पोषण अभियानअंतर्गत शासकीय कामांसाठी देण्यात आलेले मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत, त्यामुळे त्रस्त झालेल्या अंबरनाथ तालुक्यातील समस्त अंगणवाडी सेविकांनी सोमवारी सामूहिकरित्या मोबाईल वापसी आंदोलन केले. या आंदोलनात अंगणवाडी सेविका प्रकल्प उल्हासनगर- बदलापूरच्या प्रकल्पप्रमुख राजेश्वरी पानसरे, बीड प्रमुख अनिता सोनकवडे, जयश्री अहिरे, आशा शिंदे यांच्यासह अनेक अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.
शासनाच्या वतीने पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना सन २०१९ मध्ये शासकीय कामकाज करण्यासाठी मोबाईल वाटप करण्यात आले होते. मोबाईलमध्ये लाभार्थ्यांची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती महिलांची माहिती, पोषण आहाराचे वाटप आदी संदर्भात सविस्तर माहिती भरण्यात येते, मात्र या मोबाईलची क्षमता कमी असल्याने माहिती भरताना मोबाईल वारंवार हँग होणे, मोबाईल लवकरच गरम होत असल्याने सेविकांना काम करताना अनेक अडचणी येत आहेत, हा मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून यासाठी होणारा तीन ते आठ हजार रुपये दुरुस्ती खर्च सेविकांना झेपावत नाही, शासनाने दिलेले पोषण ट्रॅकर ॲप मोबाईलमध्ये रॅम कमी असल्याने डाऊनलोड होत नाही, त्यामुळे सेविकांना ते ॲप आपल्या घरगुती वापरातील मोबाइलमध्ये डाउनलोड करावे लागते, सदर ॲप इंग्रजीमध्ये असल्याने अनेक सेविकांना इतरांची मदत घ्यावी लागते मात्र हे काम दैनंदिन स्वरूपाचे असल्याने रोज इतर व्यक्तींकडून माहिती भरता येत नाही. या ॲपमध्ये डिलीट चा पर्याय नसणे, वर्गवारी किंवा लाभार्थी गट न बदलणे, दैनंदिन करण्याची कामे आदी सेवांबाबत कोणतेही मार्गदर्शन न होणे ही सर्व प्रक्रिया अतिशय किचकट आहे. मोबाईलमधील या त्रुटी उणिवांमुळे अंगणवाडीसेविका त्रस्त झाल्या होत्या. त्यामुळे सोमवारी त्रस्त झालेल्या अंबरनाथ तालुक्यातील समस्त अंगणवाडी सेविकांनी सोमवारी सामूहिकरित्या मोबाईल वापसी आंदोलन केले.