डोंबिवली ( शंकर जाधव ) : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील शाब्दिक युद्धामुळे राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगला होता.यावर वंचित बहुजन आघाडीने या वादावर भाष्य करत मंत्र्यांच्या भांडणामुळे राज्यात राडा संस्कृतीला वाव अशी टीका प्रदेशाध्यक्षा निलेश विश्वकर्मा यांनी केली. वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा संवाद मेळाव्याचे कल्याण मधील अशोक नगर , वालधुनी येथील बुद्ध फाउंडेशन येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्षा विश्वकर्मा म्हणाले, केंद्र सरकार `हम दो हमारे दो` यावर चालले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघंजण अदानी आणि अंबानी या दोन लोकांसाठीच काम करत असून केंद्र सरकारला शेतकरी, तरुण आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्याशी काही देणं घेणं नाही. केवळ स्वतःचा आर्थिक फायदा करून घेणं हीच एक भूमिका आहे. इतकेच नव्हे तर राज्यात देखील मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री ज्या पद्धतीने एकमेकांशी भिडले हे अंत्यंत निषेधार्थ आहे. यामुळे महाराष्ट्रात राडा संस्कृतीला अधिक वाव दिला जात आहे.
यावेळी विश्वकर्मा यांनी नॅशनल रेयोन कंपनीतील वाताहत झालेल्या कामगारांना मदत मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. निवडणुकीसंदर्भात त्यांना विचारले असता कोणत्याही युती संदर्भात मी काहीही बोलणे उचित नसून पक्ष श्रेष्ठी जे ठरवतील तसच होईल मात्र आम्ही स्वबळावर लढण्याची देखील तयारी ठेवली असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. राज्य सरकार आणि केंद्र सरकार ज्या पद्धतीने कोरोनाची तिसरी लाट आणि चौथी लाट बद्दल बोलत असतात पण यांनी कोणतीही सोय न केल्यामुळे घाबरवून ठेवता असून नागरिकांना डांबून ठेवण्याची शिक्षा देत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पक्षाच्या बांधणीसाठी हा मेळावा आयोजित केला आसून तरुणांनी पुढे यावे आणि समाजकारण आणि राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी या बांधणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्षाचे महासचिव राजेंद्र पातोडे, ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.