शहराध्यक्ष अभिजीत करंजुले व समाजसेवक विश्वजीत करंजुले यांनी पालिका अधिकाऱ्यांसमोर रहिवाशांची मांडली अडचण
अंबरनाथ दि. ०३ (नवाज अब्दुलसत्तार वणू) :अंबरनाथ शहरातील अनधिकृत डम्पिंग हटवल्यानंतर शहरातील कचर्याचा प्रश्न सुटला असं वाटत असतानाच आता वर्गीकरणाच्या मुद्द्यावरून अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा कचऱ्याचा प्रश्न पेटलाय.
१०० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या गृहसंकुलांनी आपल्याच सोसायटीमध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा अजब फतवा अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी काढलाय. या फतव्यानुसार शहरातील अनेक गृह संकुलांना पालिकेनं नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.याच आदेशानुसार मागील आठवडाभरापासून अनेक गृहसंकुलातील कचरा पालिकेच्या माध्यमातून उचलला जात नाही. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये कचऱ्याचे ढीग पडल्याचं पाहायला मिळतंय.आठवडाभरापासून इमारतीच्या आवारातच कचरा पडून असल्याने अनेक सोसायट्यांमध्ये दुर्गंधी पसरलीय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अंबरनाथ पालिकेनं काढलेल्या या नव्या आदेशामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. या प्रकाराने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज पालिकेचे आरोग्य अधिकारी सुरेश पाटील यांना परिसरात बोलावून घेराव घातला.
भाजपाचे अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले-पाटील व समाजसेवक विश्वजीत करंजुले-पाटील यांनी सोसायटीमधील नागरिकांची भेट घेऊन अंबरनाथ नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी सुरेश पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन रहिवाशांची अडचण मांडली, अचानकपणे नियम लागू करायला घेतल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे विलीगिकरण होत नाही. असेही आढळून आले आहे. दरम्यान कर्तव्यदक्ष नागरिकांनीही या नवीन नियमांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा द्यायची तयारी दर्शवली. मात्र अनेक गृहसंकुलात नागरिकांना जैविक प्रक्रियेची माहितीच नसल्यामुळे याचे प्रशिक्षण प्रत्येक गृहसंकुलात द्यावे अशी मागणी यावेळी बैठकीत करण्यात आली. सदर जैविक प्रक्रिया निर्माण करण्याकरिता किमान दोन महिन्याची कालावधी द्यावी अशी वार्ड क्रमांक ३९ चे समाजसेवक विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्फत पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
तर ओल्या कचऱ्यावर सोसायटीमध्येच प्रक्रिया करण्याच्या अंबरनाथ पालिकेच्या नियमाला अनेक सोसायट्यांनी विरोध केला असून जर दोन दिवसात पालिकेने कचरा उचलला नाही तर पालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कचरा आणून टाकणार असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे, त्यामुळे शहरातील कचरा प्रश्न आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.