ठाणे - विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने भारत सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्यात आली आहेत. या विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सी. बी. एस. सी. ई पॅटर्न च्या धर्तीवर बारावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ३० जागांपैकी शहापूर तालुक्यातील – २१ पात्र विद्यार्थी, मुरबाड तालुक्यातील – ०१ पात्र विद्यार्थी, भिवंडी तालुक्यातील- ०१ पात्र विद्यार्थी असे एकूण - २३ पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ३० जागांपैकी २३ जागेवर पात्र विद्यार्थ्यांची निवड झाली आणि शहापूर तालुक्यातील २१ विद्यार्थ्यांची निवड झाली ही आनंदाची बाब आहे. या सर्व विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या आहेत.
ठाणे व पालघर जिल्ह्यासाठी नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वी च्या एकूण ८० जागा आहेत. त्यापैकी ६० जागा ग्रामीण भागासाठी व २० जागा शहरी भागासाठी असतात. यात ठाणे जिल्ह्यासाठी ग्रामीण भागासाठी ३० जागा व शहरी भागासाठी १० जागा राखीव असतात. संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३० जागांपैकी २३ पात्र विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी (शिक्षण), गटशिक्षाधिकारी या सर्वांना शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.